समर्थ रामदास नसते हे तर शिवाजीला कोण विचारलं असतं असं विधान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात केलं असल्याने नव्या वादाला ठिणगी मिळाली आहे. गुरूंचे महत्त्व पटवून देताना त्यांनी हे विधान केले. परंतु यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे.
समर्थ रामदास नसते, तर शिवाजीला कुणी विचारलं असतं ? असं आक्षेपार्ह्य विधान करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या पराक्रमाचा घोर अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे
सोलापुरातील शिवसैनिकांनी सोमवार दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ जमावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी केले आहे.
कोण आहेत कोश्यारी..
उत्तराखंडच्या बगेश्वर जिल्ह्यात भगत सिंह कोश्यारी यांचा 17 जून 1942 रोजी जन्म झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य होण्याआधी उत्तर प्रदेशचा भाग होता. त्यामुळं कोशियारींचं बालपण, शिक्षण आणि सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभही उत्तर प्रदेशातच झाली. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. 1961-62 या काळात ते अलमोडा कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते.
पेशानं शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरुवात केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले.सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत आहेत.